पालघर (वार्ताहर) : कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे राज्यात उद्भवलेल्या अर्थिक संकटाच्या काळात अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजनेचे पुर्नज्जीवन राज्य शासनाने केले आहे.
खावटी अनुदान योजनेमध्ये पात्र लाभार्थानी भरावयाचे अर्ज प्रकल्प कार्यालय डहाणू यांच्याकडून ग्रामपंचायत आणि नागरी भागासाठी गठीत केलेल्या समितीकडे देण्यात येत आहेत, त्या समितीमध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषिसेवक, डाकसेवक, शिक्षक आणि प्रकल्प कार्यालयाचा प्रतिनिधी आहे. अनुसूचित जमातीच्या कुटुंबाला खावटी योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळावा आणि कागदपत्रांची पुर्तता लवकर व्हावी या उद्देशाने डहाणू प्रकल्प कार्यालयाने यापुर्वी ग्रामपंचायतीमध्ये “खावटी अनुदान योजना महासंपर्क अभियानाचे” आयोजन केले होते.
त्याच प्रमाणे दिनांक १ ते ४ डिसेंबर २०२० या कालावधीत खावटी योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी तसेच कागदपत्र अपुर्ण राहिलेल्या, लाभार्थ्यांनी खावटी अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या निकषाप्रमाणे आदिवासी बांधवांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या शासकिय कर्मचाऱ्यांशी संपर्क करून अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावे. कागदपत्रांची पुर्तता करून अर्ज परिपुर्ण करून घ्यावा. सदरच्या अभियानासाठी प्रकल्प कार्यालय डहाणू यांचेकडुन १२०० अधिकारी/ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदरची योजनेचे पात्र लाभार्थी निवड लवकरात-लवकर पुर्ण करावयाची असल्याने तसेच पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी या कालावधीत पात्र लाभार्थ्यांनी परिपुर्ण कागदपत्रासह अर्ज भरणे आवश्यक आहे.
● मनरेगावर १ दिवस कार्यरत असलेला आदिवासी मजूर (०१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत) ●आदिम जमातीतील सर्व कुटुंबे ●पारधी जमातीतील सर्व कुटुंबे ●भुमिहिन शेतमजूर ●परितक्त्ता/घटस्पोटीत महिला/ विधवा/ कुमारी माता ●अपंग व्यक्ती असलेले कुटुंब व अनाथ मुलांचे संगोपन करणारे आदिवासी कुटुंब ●वैयक्तिक वनहक्कधारक कुटुंबे.
तरी खावटी अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र अनुसूचित जमातीच्या कुटुंबानी खावटी अनुदान योजना महासंपर्क अभियानामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन डहाणू प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी आशीमा मित्तल यांनी केले .